आज मुंबईतील यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत देश व राज्य पातळीवरील विविध प्रश्नांचा परामर्श घेतला. काल नवी दिल्लीत युनिफॉर्ममधील पोलिसाला मारहाण झाली. पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे त्यामुळे देशातील पोलिसांचे खच्चीकरण होते आहे.
कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींचे अशा रीतीने मनोबल खच्ची झाले तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. दिल्ली पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी दिल्लीच्या जनतेने भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे.
दिल्लीत जो प्रकार घडला त्याची गंभीर नोंद घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे . केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रातून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पण विमा कंपन्या जबाबदारी पार पडत नाहीत. त्यामुळे सरकारने बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना कंपन्यांना द्याव्यात.
लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्येचा निकाल येणार आहे. निकाल लागल्यानंतर समाजातील कोणत्याही घटकाने हा निकाल आपल्या विरोधी लागला आहे, असा विचार करू नये. न्यायालयीन निर्णय लागल्यावर तो सामंजस्याने स्वीकारण्याची गरज आहे.
निकाल काहीही लागला तरी कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. जी परिस्थिती १९९२ साली उद्भवली त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहन मी करतो.
भाजपा-शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे, त्यामुळे ते काम समर्थपणे पार पाडण्याची आमची भूमिका आहे.
0 Comments